कढोली खुर्द येथे पुन्हा ‘सत्तापालट’

By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील कढोली खुर्द गट ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा सत्तापालट झाला असून सरपंच व उपसरपंचपद आता भाजपाकडे आले आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचे कारण देत सरपंच व सदस्य असलेल्या दोन आदिवासी महिलांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र केल्यामुळे सरपंचपद अनुसूचित जमाती आरक्षणानुसार काँग्रेस समर्थित विरोधी गटाकडे गेले होते. मात्र, सरपंच निर्मलाताई कवडू मरस्कोल्हे आणि सदस्या सीताबाई बाळकृष्ण पंधरे यांनी विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे केलेल्या अपिलावर निकाल देत त्यांचे सदस्यत्व अपात्र न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 7 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पत्रानुसार सदस्यत्व अपात्रतेची कारवाई स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ववत निर्मला कवडू मरस्कोल्हे यांना सरपंचपद तसेच सीताबाई पंधरे यांचे सदस्य पद प्राप्त झाले आहे.
26 ऑगस्ट 2024 रोजी झालेली सरपंचनिवड अवैध ठरवून कोरपना तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यापूर्वी शेतकरी संघटनेचे उपसरपंच डॉ. विनायक डोहे आणि गोंगपाच्या निर्मलाताई यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यामुळे कढोली खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचपद भाजपाकडे आले आहे. कित्येक वर्षांपासून शेतकरी संघटनेचा गड असलेल्या कढोली खुर्द येथे शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते सुदाम लांडे यांनी भाजपा प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ शेतकरी संघटनेच्या बहुतेक कार्यकर्त्यानी देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा प्रवेश केला होता.
जिल्हाधिकारी यांनी दोन आदिवासी महिलांचे सदस्यत्व अपात्र केल्यानंतर भाजपाचे राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी जि.प. अध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांनी कढोली खुर्द ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष देऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आपल्याला न्याय मिळू शकला, अशी भावना उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी व्यक्त केली आहे.
कढोली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सत्ताप्राप्तीसाठी सतत खटाटोप सुरू राहिल्याने येथे विकासकामे ठप्प पडून अस्थिरता कायम राहिली आहे. मात्र, आता भाजपाच्या हाती सत्ता आल्याने गावाच्या विकासाला गती येईल, असे मानले जात आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *