लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– शोर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा यांचा पवित्र संगम जिथे पहायला मिळतो ते क्षेत्र म्हणजे भारतीय सीमा सुरक्षा बल. चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा तालुक्यातील ब्लॅक गोल्ड व्हिलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सास्ती येथील विजय तुळशीराम शेंडे यांनी भारतीय सिमा सुरक्षा बल मध्ये सब इन्स्पेक्टर पदावर २३ वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त घेतली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या या भुमिपुत्राच्या सेवा निवृत्तीला संस्मरणीय करण्यासाठी आप्तस्नेहीजन, मित्रमंडळी, नातेवाईक आणि नागरिकांनी मोठय़ा उत्साहाने, जल्लोषात भव्य मिरवणूक काढुन पुष्पवर्षाव करीत, नाचत गाचत त्याचे जंगी स्वागत केले. सायंकाळी हाँटेल सिद्धार्थ येथे एका स्वागत सोहळ्यात आपल्या मायभुमीत विजयचा सपत्नीक ह्रदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना विजय ने सांगितले की, बालपणापासून सैनिक होऊन देशसेवा करण्याची सुप्त इच्छा होती. प्रचंड परिश्रमातुन भारतीय सिमा सुरक्षा रक्षक दलात भरती झालो आणि आयुष्याची २३ वर्षे सेवा दिली. यात पत्नी शिल्पा शेंडे ची अनमोल साथ मिळाली. तीनेही मुलगा शिववंश आणि मुलगी देवांशी यांचा बालपणापासून एकटीने समाजात स्वाभिमानाने वावरत मोठय़ा जिकिरीने सांभाळ केला. आता उर्वरित आयुष्य आनखी नव्या उमेदीने, ऊर्जेने वेगळा पद्धतीने देशसेवेत व्यतीत करण्याचा मानस असल्याचे मत त्यांने व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे विजय चा भाऊ अजय शेंडे हा देखील मागील २० वर्षापासून सीआरपीएफ मध्ये कार्यरत असून सध्या गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांशी दोन हात करीत आहे. एकाच कुटुंबातील हे दोन्ही भाऊ देशाच्या सैन्यात दाखल होऊन देशसेवा करीत आहेत ही अभिमानाची बाब आहे. सेवानिवृत्त सब इन्स्पेक्टर विजय शेंडे यांच्या स्वागत व सत्कार प्रसंगी माजी नगरसेवक सुभाष कोसनगट्टीवार, चांदा पब्लिक स्कूल च्या संचालिका स्मिता जिवतोडे, प्रधानाचार्या आम्रपाली पडोळे यांनी उपस्थित राहून त्यांच्या शोर्यगाथेवर प्रकाश टाकला. या प्रसंगी त्याचे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी, देशप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.