कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕देशभक्तीने भारलेल्या वातावरणात भाजपचा स्थापना दिन चंद्रपुरात साजरा*

भारतीय जनता पार्टी हा देशहितासाठी , देशसेवेसाठी काम करणारा पक्ष आहे . अटलजी , अडवाणीजी , नरेंदभाई मोदी अशा अनेक ज्येष्ठांनी सत्तेत नसताना पक्षाचा पाया रचला. या पायाचा कळस करण्याचे काम देशातील असंख्य कार्यकर्त्यांनी केले. राज्यात , केंद्रात सत्ता नसताना भाजपचा विचार घेऊन अनेकांनी पक्षविस्तारासाठी घेतलेल्या परिश्रमातुन आज या पक्षाने विशाल रूप धारण केले आहे. भाजपात कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहे.कार्यकर्ता भाजपाच्या नेत्यांना , कार्यकर्त्यांना ऊर्जा दे , उत्साह दे , शेवटच्या गरीब व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची शक्ति दे अशी प्रार्थना मी माता महाकालीच्या चरणी करतो , असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि.6 एप्रिल रोजी चंद्रपूरातील गांधी चौकात आयोजित भाजपच्या स्थापना दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात आ मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले , चंद्रपुरात भाजपचा पाया रचण्याचे काम चंदनसिंह चंदेल , रमेशचंद्र बागला, विजय राऊत अशा अनेक ज्येष्ठांनी केले . 1995 मध्ये चंदनसिंहजीनी पक्षश्रेष्ठींना माझ्या नावाची शिफारस केली नसती तर कदाचित मी आज आमदार , मंत्री राहिलो नसतो. नेत्यांचे प्रेम ही आमची शक्ति आहे. प्रतिकूल परिस्थितीत या नेत्यांनी पक्षाची पाळेमुळे जिल्ह्यात रुजविली. रमेशचंद्रजी बागला यांच्या घरावर दगडफेक झाली , जाळपोळीचा प्रयत्न झाला पण पक्षाला सर्वोपरी मानणाऱ्या रमेशचंद्रजींनी हार न मानता आपल्या पक्षनिष्ठेचा प्रत्यय दिला असेही ते म्हणाले.

आज विश्वगौरव नरेंदभाई मोदी पंतप्रधान झाले , देशात भाजपचे 303 खासदार निवडून आले. श्रद्धेय अटलजी म्हणायचे क्या हार मे क्या जीत मे किंचित नही भयभीत मै. कधीही पराभवाची भीती न बाळगता या नेत्यांनी विजयाचा मार्ग प्रशस्त केला असे सांगत भाषणाच्या शेवटी उपस्थित नेते व कार्यकर्त्यांना त्यांनी प्रतिज्ञा दिली.

यावेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर , ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल ,रमेशचंद्र बागला , मोहन घरोटे, वनमालाताई ठाकर , भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , महापौर सौ राखी कंचर्लावार , महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे, प्रमोद कडू , राजेंद्र गांधी , सुभाष कासनगोट्टूवार , माजी महापौर अंजली घोटेकर ,भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना हंसराज अहिर म्हणाले , राष्ट्रभक्तीचा पर्यायी शब्द म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. अनेक ज्येष्ठांनी घरावर तुळशीपत्र ठेवून पक्ष विस्तारासाठी योगदान दिले.पंतप्रधान मोदीजींनी सबका साथ सबका विकास हा नारा दिला ,त्याला विश्वासाची जोड दिली व भारतीय जनतेने भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिला असेही हंसराज अहिर म्हणाले.
यावेळी पक्ष विस्तारासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार करण्यात आला .भागवताचार्य मनीष महाराज ,मौलाना अतिकुर रहेमान,सरवन सिंह राठोड,
भन्तेजी सुमनवास्थु महाथेरो ,पास्टर सुनील कुमार या धर्मप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर भूमकर परिवारातर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here